महाराष्ट्रातील सुतार समाज उद्या आयुक्तांना निवेदन देणार
बावडा- पुणे (एरंडवणा) येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाचे अपहरण करून निर्घृणपणे खून केल्याने त्याचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील सुतार समाज एकवटला आहे. सोमवारी (दि.20) सुतार समाजाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करावी व पीडित कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी करणार आहे. अशी माहिती बावडा (ता. इंदापूर) येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली.
मयूर मारुती भागवत (वय 35) या तरुणाचे अपहरण करून निर्घृणपणे खून करून तो दडपण्याचा प्रयत्न केला होता. तो पोलिसांनी उघड करून आरोपींना अटक केली आहे. परंतु आरोपींना अटक शिक्षाही होईल, यासाठी कायद्यावर आमचा विश्वास आहे. परंतु गरीब कुटुंबातील करता पुरुषच गेल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. मयूर हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. अन्याय झालेल्या कुटुंबास शासन स्तरावरून आर्थिक स्वरुपात तातडीने मदत करून त्यांना उपजीविकेचे साधन प्राप्त करून द्यावे. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीमार्फत विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास लवकरच सर्व समाजबांधवांच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.