खरा वारसदार कंगालच ः स्थानिकांना योग्य न्याय नाही
कुरकुंभ- पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कुरकुंभ गावात 1989 मध्ये एमआयडीसी निर्मितीचा पाया रोवला गेला. औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाल्याने दौंड तालुक्यात अर्थकारणाचे वारे वाहू लागले. शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमिनी वसाहतीसाठी गेल्या. स्थानिकांना रोजगार मिळतील अशी आशा होती; पण मात्र आता हे वारसदारच- स्थानिक कामगारच कंगाल झाला आहे. वसाहती स्थापनेपासून या स्थानिकांना योग्य न्याय मिळाला नाही. न्याय हक्कांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. स्थापनेपासूनच स्थानिक तरुणांना हीन दर्जाची वागणूक कंपन्यांकडून दिली जात आहे.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी गावातच मिळणार असल्याने एमआयडीसी स्थापनेवेळी अनेकांनी आपल्या जमिनी दिल्या.
गावात एमआयडीसीची पायाभरणी झाल्याने पूर्ण जिल्ह्यात कुरकुंभचे नाव झाले. 1989 मध्ये कुरकुंभ एमआयडीसीच्या स्थापनेसाठी कुरकुंभ, पांढरेवाडी या दोन गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. एकूण 474 हेक्टर मध्ये एमआयडीसीचे क्षेत्रफळ आहे. कुरकुंभ गाव औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने अनुकूल असल्याने येथे वासहतनिर्मिती झाली खरी, मात्र कालांतराने उद्योजकांनी येथे रासायनिक कंपन्या वाढविल्या. शासनाच्या नियमानुसार कंपनीच्या आस्थापनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारावर प्रथम प्राधान्य स्थानिक बेरोजगारांना मिळणे आवश्यक आहे; परंतु येथे परप्रांतीयांना प्रथम प्राधान्य दिले जात असून खरा वारसदार मात्र कंगाल होत असल्याचे चित्र आहे.
- बेरोजगारांचे प्रमाण वाढले
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून औद्योगिक वसाहतीचे प्रदूषण ग्रामस्थ सहन करीत आहेत. प्रदूषणाची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने बहुतांश शेतकरी याचा त्रास सहन करीत येथेच राहतात. अशा स्थितीत स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसल्याने येथील उच्चशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देत नसल्याने परिसरात बेरोजगार तरुणांचे प्रमाण वाढत आहे. - सध्या येथील शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पन्न शून्य झाले आहे. मात्र, बाहेरचे माला-माल झाल्याचे चित्र आहे. खरा वारसदार प्रदूषित नापिकी जमिनीचा मालक झाला आहे. स्थानिकांना कायमस्वरूपी कामावर घेतले जात नाही. शेतीसाठी सोडाच पण जनावरांना पिण्यायोग्य पाणीही येथे राहिले नाही.
– संदीप जगताप, ग्रापंचायत सदस्य, पांढरेवाडी