उन्हाच्या कडाक्यात पाणी, धान्याची व्यवस्था करण्याची गरज
आकाश दडस
पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चाललेले असतात एप्रिल महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाहीत. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते. पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे गरज आहे ती आपणही पक्षीमित्र बनण्याची. पाणी आणि अन्नासाठी पक्ष्यांना मदत करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी, अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करावीच लागेल.
आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. विविध जागतिक दिन केवळ नावापुरतेच आहेत का? असा प्रश्न पडावा. ते शोपुरतेच साजरे करण्यापेक्षा वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे.वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे, झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्या वन्य प्राण्याना जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. “पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.
शासनाने ठरवून दिलेला चिमणी दिन, पर्यावरण दिन, जलदिनसह अनेक दिनाला अनेक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींचा भरभरून प्रतिसाद मिळतो. यामध्ये पक्ष्यांना धान्य, पाणी देऊन हे दिन साजरे करण्यात येतात. एक दिवस जागृती किंवा हे दिन साजरे केल्याने पशु-पक्षी बचावणार नाहीत. त्यासाठी समाजजागृती होऊन प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा.
उन्हाच्या चटक्याने वन्य जीव, पशु-पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. वन्यजीवांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी शासनाबरोबर सर्वांनी पुढाकार घ्यावा. पूर्वी शेकडो पक्षी, झाडे पाहावयास मिळायची. पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसन्न वाटायचे. मात्र, परिस्थिती उलट झाली आहे. ग्रामीण भागात विहिरी, झाडे, अडगळीच्या खोल्या आदीमध्ये सुगरणीने घरकाम केलेली घरटी आढळून येतात. मात्र, ही विणकाम केलेली घरटी पक्ष्यांविना रिकामी आहेत.
पाण्यासाठी सध्या सर्वांचीच धडपड सुरू आहे. किमान गरजेपुरते पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून पक्ष्यांनाही मदत होईल असे काम करण्याची गरज आहे. आपल्या घराच्या अवतीभोवती, परिसरात पक्ष्यांसाठी छोटी घरटी तयार करणे किंवा त्यांना निवारा तयार करून देणे गरजेचे आहे. अनेक पक्षीमित्रांनी जंगलात जाऊन पाणवठे तयार केले आहेत. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. त्यामुळे चिमणी आणि बुलबुल यांच्याशिवाय अन्य पक्षांचेही आवाज ऐकू येऊ लागलेत. दुष्काळी भागातून पक्षी आपल्याकडे येत आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीने प्रत्येकाची मदत महत्वाची ठरेल.
विविध प्रजातीची हरणे, माकडे, नीलगायी आदी वन्यप्राण्यांसह मोर, कबूतरे, चिमणी, कावळे मैना, पोपट, तितर, सर्पगरुड, गिधाड यांसारखे असंख्य पक्षी आढळून येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या सर्व वन्यजीवांना पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासते.नागरी वस्तीकडे येणारे बहूतांश प्राणी, पक्षी पाणी आणि अन्नाच्या शोधातच येतात. त्यामुळे त्यांना ते जंगलाच्या परिसरातच उपलब्ध झाले तर त्यांचे नागरी वस्तीकडे येणारे प्रमाण कमी होईल. जंगलांसह नागरी वस्तीत काय नागरिकांना अनेक गोष्टी करता येतील.घर, बाग, रस्ता ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी, बागेत एखादी कुंडी, पाण्यासाठी एखादे पसरट भांडे ठेवले, तसेच उरलेले अन्न ठेवले तर आपल्या घराजवळ बगीच्याकडे येणाऱ्या पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. यामध्ये पाण्याचे कुंड, पसरट भांडे उंचावर, थोडे सावलीत ठेवावे. त्याठिकाणीच अन्न, कण्या, धान्य न ठेवता ते बाजूला ठेवावे, जेणेकरून मुंग्या लागणार नाहीत.