पाणीबचतीचा नगर परिषदेकडून कानमंत्र
रेडा- उजनी जलाशयाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वेगाने घट होत असल्याने इंदापूर शहरातील नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणीबचत करावी, असा कानमंत्र इंदापूर नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. यंदा माळवाङी जॅकवेलपासून पाण्याची पातळी खालावल्यामुळे मोटार पंपाच्या सहाय्याने उचल पाणी करून जॅकवेल चारीमध्ये पाणी सोडून पाणीपुरवठा सुरू करावा लागत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे शहरवासीय चांगलेच त्रासले आहेत.
मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले की, उजनी जलाशयाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वेगाने घट होत असल्याने इंदापूर शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करावे. यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी जलाशयातील पाणी पातळी अत्यंत वेगाने कमी होत असल्याने शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी आपल्या नळ कनेक्शनला तोटी बसून घ्यावी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सडा टाकून पाणी वाया जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गाड्या पाण्याने धुवून पाणी वाया घालवू नये. आपले पाणी भरून झाल्यानंतर नळ तोटी बंद करावी .म्हणजे नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होईल. वेळ प्रसंगी दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा करावा लागेल. तरीही पाणी साठवून ठेवावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.