आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीला पाणीपुरवठा करणारा सिद्धबेट येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात आजही मुबलक पाणीसाठा असताना सोमवार (दि. 6) आळंदीकरांना दिवसाआड पाणी देण्याचे षड्यंत्र रचले आहे, असा आरोप नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमराव गोगावले यांनी केला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा सिद्धबेट येथील इंद्रायणीवरील बंधाऱ्यात जलसाठा कमी झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे काही नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे संदेश नागरिकांना पाठविला. वास्तव असे आहे की, इंद्रायणीवरील या बंधाऱ्यात पाणीसाठा मुबलक आहे. मात्र, बंधाऱ्यातील नादुरूस्त ढाप्यांमुळे पाण्याची गळती होत असल्याने दररोरोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाण्यामुळे रान पेटू नये म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा केला का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
आळंदीत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली. आळंदीतील गावणाठात खेड हद्दीत मंगळवारी(दि.)सकाळपासून पाणी वितरित झाले. दरम्यान, बुधवारी (दि. 8) गावठाणात पाणीपुरवठा होणार नसून तो देहूफाटा, काळेवाडी, इंद्रायणीनगर या नदीच्या पलिकडील भागात केला जाणार आहे. दरम्यान, बंधाऱ्यावरील ढापे चांगले नसल्याने हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे. जर पाणीसाठा कमी आहे, तर मग बंधाऱ्यातून गळतीद्वारे वाया जाणारे पाणी पालिका रोखून का शकली नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पिंपरी महापालिका हद्दीतून येणारे लाखो लिटरचे सांडपाणी याच बंधाऱ्याच अडविले जाते आणि हेच सांडपाणी शुद्धीकरण केल्यानंतर शहरात वापरासाठी वितरित केले जात असल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांकडून दिले जाणारे पाणीसाठ कमी असल्याचे कारण नागरिकांना तकलादू वाटत आहे.
- नगराध्यक्ष व नगरसेवकांची वेगळी माहिती
जलशुद्धीकरणास पुरेसा वेळ मिळावा म्हणून आळंदीत दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नदीला असलेली जलपर्णी, पंपिंगसाठीचा वेळ, वॉशआऊट करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. यामुळे समान पाणी वाटप होत नाही. आता दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून रोज पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत पाणीपुरवले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली. तर मग नगरसेवकांद्वारे सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेशाचे काय? या विसंगत बाबींमुळे नगरापालिकेचे नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्ये काही बिनसले आहे की त्यांना वास्तव माहित नाही का? हा प्रश्न यातून निर्माण होत आहे. - जलपर्णी रोखण्यात पालिका अपयशी
केळगाव ते सिद्धबेट येथील इंद्रायणीतील बंधाऱ्यात सध्या बेसुमार जलपर्णी वाढली आहे तर बंधाऱ्याच्या खाली गरूड स्तंभापर्यंत जलपर्णी केवळ वाढलीच नाही तर बहूतांश ठिकाणी वाळून गेली आहे. जलपर्णी रोखण्यासाठी लावलेले प्लॅस्टिकचे बॅरेल पालिकेच्या दुर्लक्षामुळे अस्ताव्यस्त झाले. बॅरेलचा खर्च वाया गेला असून जलपर्णी रोखण्यात पालिका अपयशी ठरली. याशिवाय पालिकेने जलपर्णी काढण्यासाठी वार्षित ठेका दिला. मात्र, कार्तिकी यात्रेनंतर यावर कामच झाले नसल्याने नदी प्रदुषणात आणखी भर पडली आहे. - पाणीपुरवठा केंद्रात सावळा गोंधळ
जलशुद्धीकरण यंत्रणेत काम करणारे कामगार हे गटनेते पांडुरंग वहिले यांचे सहा कर्मचारी आहे व दुसरे योगेश एंटरप्राइजेस यांचे सहा कर्मचारी कुशल की अकुशल यात देखील शंका असून यांच्या मर्जीतील सहा पैकी एक जण काम करतो व इतर पाच हजेरी लावुन घरी निघून जातात. शासनाने पाणी शुद्धीकरणासाठी एवढी मोठी यंत्रणा कार्यान्वित करून देखील आळंदी करांना दिवसाआड पाणी दिले जाते यात चाकण रस्ता, पद्मावती रस्ता, वडगाव रस्ता या परिसरात पुरेशा दाबाने नागरिकांना पाणी मिळत नाही देहू फाटा परिसरात स्वतंत्र जलवाहिनी आहे. आळंदी शहरासाठी तीन ठिकाणांहून पाणी वितरित केले जाते. पाणीपुरवठा केंद्रात चाललेला सावळा गोंधळ कुशल की अकुशल कामगारांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी उत्तम गोगावले यांनी केली आहे. - आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी प्रथम पूर्ण चौकशी करावी व नंतरच पुराव्यानिशी आरोप करावेत मी नगरसेवक आहे. पालिकेचा ठेकेदार नाही मी लोकांना कामे देतो मात्र, पालिकेत ठेकेदारी करत नाही.
– पांडुरंग वहिले, गटनेते, आळंदी नगरपालिका - पाणीवाटपाबाबत प्रशासनाने लक्ष घालावे त्यासह देहू फाटा आळंदीकरांना पाणी वाटपाचे नियोजन हे प्रशासन व त्यांच्या विभागातील स्थानिक नगरसेवकांनी करणे गरजेचे आहे. ज्यांना एकापेक्षा अधिक नळजोडणी दिले आहेत आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. यामुळे काहींना मुबलक पाणी मिळते तर काहींना अजिबातच मिळत नाही त्यासाठी लवकरच मीटर बसवण्याची गरज आहे.
– सचिन गिलबिले, सभापती, पाणीपुरवठा समिती