दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीही भाविकांची मोठी गर्दी
कोपरगाव – आत्मा मालिक माऊलींनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या रूपाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संकुलात असंख्य मुले, मुली आनंदाने शिक्षण घेत आहेत. आत्मा मालिकने मुलांवर संस्कार करून एक मोठे कुटुंब तयार केले आहे. त्यामुळे आत्मा मालिक ध्यानपीठ हे देशातील महत्त्वाचं संस्कार केंद्र बनलं आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
ना. विखे यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आत्मा मालिक माऊलींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. ना. विखे पाटील म्हणाले, आत्मा मालिक माऊलींचे दर्शन झाले की एक वेगळी ऊर्जा मिळते. येथे निःस्वार्थपणे व अविरतपणे जनकल्याणाचा वसा घेऊन काम सुरू आहे. धकाधकीच्या जीवनात विसावा घ्यावा वाटतो. याठिकाणी मायेचा ओलावा सद्गुरूंचे आशीर्वाद आहे. हे विसाव्याचे ठिकाण आहे. माझ्या कुटुंबाने जो वारसा जपला आहे, त्याला पुढे घेऊन जाण्याची शक्ती येथून मला मिळते. आलेल्या सर्व भाविकांच्या मनोकामना सद्गुरू नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास आहे.
राज्यातील जनतेची सेवा करताना माझ्या हातून कोणतीही चूक घडू देऊ नका, असे साकडे त्यांनी आत्मा मालिक माऊलींना घातले. आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये 14 जुलैपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवासाठी हजारो भाविकांनी आपली उपस्थिती लावून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आज नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिक्षक मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील बालकलाकार अमृत गायकवाड आदी मान्यवरांनी सद्गुरूंची भेट घेतली.
आज दिवसभरात नायगाव सत्संग मंडळाने काकड आरती व भजने सादर केली. राजस्थान येथील पद्मश्री प्रल्हाद टिपानिया यांनी भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला. मनमाड गुरुद्वारातील भजनी मंडळाने भजने सादर केली. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांबच्या माध्यमातून कलाप्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळविली. संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, केदार सारडा (इंदौर) यांनी आपल्या प्रवचनातून गुरूमहती भाविकांना सांगितली.