भुलेश्वर – तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे शनिवारी (दि. 13) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रगतशील शेतकरी महेश बाळासाहेब यादव यांचे दोडका पीक भुईसपाट झाले आहे. यामुळे त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
फेब्रुवारीमध्ये त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात दोडका पिकाची लागवड केली होती. त्यासाठी बियाणे, दोडक्याचे वेल बांधण्यासाठी तार, कळकाच्या काठ्या, मजुरी, औषधांची फवारणी व ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरंदर उपसा योजनेचे विकतचे पाणी असा सुमारे 30 हजार रुपये खर्च केला होता. बहरात आलेल्या बागेचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दोडका पिकाला आलेली फुले संपूर्णपणे गळून पडली आहेत. तर काही वेल मध्येच तुटले आहेत. महेश यादव यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.