मुंबई – उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बंद दाराआड चर्चा केली.
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) यांमधील आक्षेपार्ह्य भागाबाबत केंद्राशी चर्चा करण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्यानंतर आजची ही बैठक पार पडली अशी माहिती राज्यातील एका बड्या नेत्याने दिली.
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर व सीएएबाबत कोणताही आक्षेप नसून कोणीही या कायद्याची भीती बाळगण्याचे कारण नाही अशी भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरेंची ही भूमिका राज्यात शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेशी विसंगत असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होते की काय अशा शंका उपस्थित करण्यात येत होत्या.
मात्र आज उद्धव ठाकरे, शरद पवार व अजित पवार यांच्या दरम्यान झलेल्या चर्चेतून सीएए, एनपीआर व एनआरसीमधील आक्षेपार्ह्य भागाबाबत केंद्राशी चर्चा करण्यावर एकवाक्यता झाली असल्याची माहिती एका बड्या नेत्याने दिली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपतर्फे कोणते मुद्दे उपस्थित केले जातील याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली.
महाविकास आघाडीमध्ये फूट पडू नये यासाठी तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेते प्रयत्नशील असल्याची माहिती देखील या नेत्याने दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी