राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर- ऊरूळी देवाची गावचे हद्दीतील राजयोग साडी सेंटर कपड्यांच्या गोडावूनला तीन दिवसांपूर्वी भीषण आग लागून 5 तरूण कर्मचारी केवळ बाहेर पडता न आल्याने होरपळून मृत्युमुखी पडले. जर कामगार कायद्यानुसार दुकान मालकाने त्यांना सुविधा पुरवल्या असत्या किंवा प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर हे तरूण मृत्युमुखी पडले नसते. आता जळीतकांड झाल्यानंतर प्रशासन कारवाईची नौटंकी करीत असते. परंतु त्यापूर्वीच पारदर्शकता आणि नियमावलीची बाज राखत काटेकोरपणे निरीक्षण केले असते तर अग्नीकांडाला पायबंद घालता आला असता, अशी चर्चा हवेली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांतून होत आहे.
महाराष्ट्र शॉप्स ऍण्ड इस्टॅब्लिशमेंट कायदा कलमान्वये काम संपल्यानंतर कामगारांना काम करत असलेल्या दुकान, मॉल अथवा कारखान्यात थांबू न देता त्याच्या आराम अथवा राहण्याची व्यवस्था इतरत्र करणे गरजेचे आहे. असा नियम आहे. केवळ आर्थिक बचत व्हावी, या हेतूने दुकानाची वेळ संपल्यानंतर कामगारांना तेथेच दुकानावर लक्ष रहावे व चोरी होवू नये म्हणून तेथेच रहावयास व मुक्काम करण्यास भाग पाडले जाते. हे नियम पायदळी तुडविले जात आहे.
मालक व चालकांना आपण त्यांच्या जिवाशी खेळत आहोत, हे नियम माहित असूनही याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. व्यावसायिक इमारत उभारताना सर्वजण नियम पायदळी तुडवताना दिसतात. कारण नियमानुसार काम केले तरी विविध खात्याच्या परवानग्या काढून त्यांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार काम करून इमारत उभी करणे हे वेळखाऊ व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे सर्व नियम गुंडाळून ठेवून काम केले जाते. याचा फटका कामगारांना बसतो. वेळप्रसंगी गुरूवारसारखी दुर्घटना घडली तर त्यांना प्राणासही मुकावे लागते. राजयोगमधील मृत्युकांड या कारणांमुळेच घडले आहे. शासनाने केलेल्या नियमानुसार छोट्या-मोठ्या उद्योग, व्यवसायाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उभारणे गरजेचे आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही, हेच या जळीतकांडावरून स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी फुरसुंगी, ऊरूळी देवाची परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जात होती. हडपसर व पुण्याची बाजारपेठ जवळ असल्याने माल नेण्यास कसलीही अडचण नव्हती. त्यामुळे पूर्वीपासूनच हा भाग सधन समजला जातो. ऊरूळी देवाचीमार्गे कात्रज बायपास झाला त्यामुळे या भागातील जमिनींना सोन्याचा भाव आला. प्रथम या ठिकाणी गोडावूनची उभारणी करण्यात आली. ही गावे महानगरपालिका हद्दीबाहेर व पुण्यालगत असल्याने कर नव्हता. त्यामुळे अनेक कारखानदारांनी आपला माल ठेवण्यासाठी या गोडावूनची निवड केली. केवळ जागा गुंतवून प्रतिमहा मोठी रक्कम हाती पडत आहे, हे लक्षात आल्यानंतर अनेकजण याकडे ओढले गेले. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गोडावूनची अस्ताव्यस्त उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसराचे गावपण हरवले.
- अद्ययावत यंत्रणेसाठी कठोर कार्यवाही करा
कामगार कायद्याविषयीचे अज्ञान व कामगार विभागाचे अधिकारी यांनी कायद्याची कठोरपणे न केलेली अंमलबजावणी तसेच पुुणे महानगरपालिकेने केलेले दुर्लक्ष आदी कारणांमुळे पाच तरूणांना मृृत्युस सामोरे जावे लागले आहे. येथे असलेल्या शेकडो दुकानात हजारो कामगार काम करीत आहेत. या दुर्घटनेचीची पुनरावृत्ती आपण काम करतो त्या ठिकाणी झाली तर? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी तात्काळ या दुकानांची तपासणी करून सुरक्षाविषयक आवश्यक त्या अद्ययावत यंत्रणा उभारून त्या जोपर्यंत कार्यान्वित होत नाहीत. तोपर्यंत दुकान अथवा गोडावून उघडण्यास परवानगी देवू नये, अशी मागणी सर्वस्तरांतून होत आहे. - गोडावूनची उभारणी आडवीतिडवी
परिसरातील फुरसुंगीसहित अनेक गावे महानगरपालिका हद्दीत जाण्यापूर्वी काही वर्षे अगोदरच हडपसर-सासवड राज्यमार्गालगत दुतर्फा फुरसुंगी ते दिवे घाट पायथ्यापर्यंत होलसेल साडी सेंटरचे जाळे उभारले गेले. पुणे, मुंबई, सुरत येथील कारखानदारांनी आपल्या कंपनीत तयार झालेला माल येथे ठेवून त्या मालाची होलसेल व किरकोळ विक्री सुरू केली. ही दुकाने व गोडावूनची उभारणी करताना मात्र, सुरक्षा आणि सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता येथील बहुतांश दुकानांत जर अचानक आग लागली तर ती विझवण्याची यंत्रणा नाही. चुकून एखादा अपघात झाला तर बाहेर पडण्यासाठी मुख्य दरवाजा वगळता पर्यायी मार्ग नाही. तसेच हवा खेळती रहावी म्हणून खिडक्या नाहीत.