रत्नागिरी – शिवसेना-भाजपने साडेचार वर्षात काहीच विकासकामे केली नाहीत. त्यामुळे लोकांचा लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांशी भांड-भांडले. मात्र निवडणूक जवळ येताच एकत्र आले. हा सत्तेसाठीचा स्वार्थीपण आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांना अफजलखानाची उपमा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहा यांच्या लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर बोलताना नारायण राणेंनी हा त्यांचा दुतोंडीपणा असल्याचे म्हटले आहे.
राणे म्हणाले, राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांनी साडे चार वर्षांत फक्त सातत्याने एकमेकांवर आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना अफजलखान म्हणून संबोधले आणि काल त्यांच्यासाठी गांधीनगरला गेले. हा सगळा खटाटोप सत्तेसाठी आहे, असे ते म्हणाले. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात कुठेही आणायचा प्रयत्न झाला तर आमचा विरोधच असेल.
दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही नारायण राणे यांनी यावेळी दिली.