सातारा,दि.6 (प्रतिनिधी) –
सातारा शहरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे सातारा ते लोणंद महामार्गाच्या कॅनोलवरील पुल खचला आहे. अगोदरच पुलाचे संरक्षक कठडे ढासळत असताना आता पुलाचा पाया खचल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साताऱ्यातील जुन्या आरटीओ चौक ते वाढे फाटा दरम्यानच्या खचलेल्या पुलावरून लोणंद व फलटण तसेच पुणे आणि कोल्हापूरच्या दिशेने वाहने जातात व सातारा शहरात येत असतात. विशेषत: अवजड वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
शनिवारी साताऱ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे पुलाचा पाया खचला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी पुलाचा पाया पुर्णत: ढासळला गेला तर रात्रीच्यावेळी सावित्री पुलाप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह, पोलीस आणि परिवहन विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेवून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.