अधिकाऱ्यांना लागते दलालांची शिफारस; सामान्यांची खुलेआम अडवणूक
प्रशातं जाधव
सातारा – अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या सातारा उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सध्या दललांचा विळखा पडलेला आहे. अधिकाऱ्यांनाही फक्त दलालांचीच भाषा कळत आसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सातारा उप-प्रादेशिक कार्यालयात दिवसभरात अनेक नागरिक विविध कामांसाठी येतात. येथे येणाऱ्या नागरिकांना या दलालांच्या अडवणुकीला , पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. दलाली संपवण्याकरिता अनेक वेळा फक्त घोषणाच करण्यात आल्या; परंतु कार्यवाही मात्र शुन्यच झाली. आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर नागरिकांना समोरच दिसतात दलालीची दुकाने थाटलेले दलाल.
या दलालांकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होत असतानाही त्यांच्यावर कुठलीच ठोस कारवाई होत नाही.कारवाईचे सोडा उलट अधिकाऱ्यांना लोकांची नाही तर दलालांची भाषा कळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांना दलालापासून सुटका मिळावी म्हणून परिवहन विभागाने ऑनलाईन सेवा सुरू केली, परंतु झाले उलटेच. दलालांनी आपल्या सोईनुसार ते सर्व शिकून घेऊन ऑनलाईनमध्येही व्यवसाय तेजीत सुरू केल्याचे वास्तव आहे.
ऑनलाईन सुविधा सुरू झाल्यानंतर काही दिवस नागरिकांना लवकर शिकाऊ लायसेन मिळत होती. काही दिवस दलाल कार्यालयातून गायब झाल्याचे चित्र होते; परंतु त्यावेळी काही नागरिकांनी भिती व्यक्त केली होती की, दलाल काही दिवसानी सर्व अपॉईंटमेटच्या तारखा फुल करतील. अगदी तसेच घडले . आणि एक ते दोन महिन्याच्या पुढील तारखा नागरिकांना मिळण्यास सुरुवात झाली.
दलालांनी ऑनलाईन प्रक्रियेत फॉर्म कसा भरायचा हे शिकून घेऊन लॅपटॉप किंवा मोठे डेस्कटॉप खरेदी करून ऑनलाईन फॉर्म भरून देण्यास सुरूवात केली. ऑनलाईन फॉर्म भरण्यास सायबर कॅफेमध्ये सुमारे 100 रूपये आणि आरटीओ विभागाची 31 रुपयांची पावती ऐवढाच खर्च लागत असताना दलाल नागरिकांकडून सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत पैसे उकळत आहेत. चालकांना पक्के लायसन काढण्यासाठी 311 रुपये ऐवढा खर्च येत असताना दलाल मात्र एक हजार दोनशे रुपयांपर्यंत नारिकांकडून पैसे उकळत आहेत.
आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यांचे आणि दलालांचे हात हातात असल्याने कर्मचारी नागरिकांची अडवणूक करून त्यांना दललाकडे जाण्यास भाग पाडत आहेत. नागरिकांना छोट्या-छोट्या चुका दाखवत अडवणूक केली जाते. मात्र तोच कागद घेऊन दलालामार्फत गेले तर काम होते . परंतु यासाठी नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. याची तक्रार करण्यासाठी वरिष्ठांकडे जाण्याचे धाडस दाखवलेच तर त्याला चकरा मारण्यास लावले जाते.
अशी ओळखतात दलालांची फाईल
सामान्य नागरिक स्वत:ची फाईल स्वत: घेऊन गेला तर त्याची अडवणूक केली जाते. मात्र फाईलवर दलालांच्या खुणा असतील तर त्या फाईलला लागलीच पुढे दाखल केले जाते. दलालांच्या प्रत्येक फाईलवर दलालाच्या नावाच्या पहिल्या व आडनावाच्या पहिल्या इंग्रजी आक्षराचा शिक्का मारलेला असतो.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा