मंचर- आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामे दिले आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुख राम गावडे यांना राजीनामा पाठविल्याची माहिती युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख कल्पेश बाणखेले यांनी दिली.
शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूर लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव लक्षात घेऊन आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिला आहे. हे राजीनामे दबावाखाली नसून पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन देण्यात आले आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. कुठलीही शंका उपस्थित न करता राजीनामे मंजुर करून न्याय द्यावा, अशी विनंती कल्पेश बाणखेले, आंबेगाव तालुका वाहतूकसेना अध्यक्ष राम जाधव, मंचर शहर शिवसेनेचे प्रमुख संदिप जुन्नरे, मंचर शहराचे ग्राहक संरक्षण अध्यक्ष भाऊसाहेब निघोट, मंचर उपशहर शिवसेनेचे प्रमुख विजय गांजाळे, मंचर शहर शिवसेनेचे संघटक संतोष बाणखेले, मंचर शहराचे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष विजय जाधव यांनी केली आहे.