खासदार सुळे : जिल्ह्यात राष्ट्रवादीला अधिक मते मिळाल्याचे केले स्पष्ट
रेडा- राज्यामध्ये केंद्रांमध्ये जरी विरोधी पक्षाचे संख्याबळ जादा असले तरी देखील दुष्काळी परिस्थितीत लोकांच्या भावना, समस्या, व्यथा जाणून घेण्यासाठी. दुष्काळी भागातील जनतेला आधार देण्यासाठी फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार फिरत आहेत. सत्तेचा दवा करणारे विरोधी पक्षाचे नेते कोणत्या कामात गुंतले आहेत, असा सवाल खासदार सुळे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला इतर पक्षांपेक्षा अधिकचे मतदान मिळाले आहे, त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद आगामी काळात दिसेल, असा आशावाद खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचा मंगळवारी (दि. 28) दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदापूर येथे खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी सोनाई समुहाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने, सभापती अप्पासाहेब जगदाळे, अशोक घोगरे, जगन्नाथ मोरे, राजेंद्र तांबिले, अरविंद वाघ, डॉ. शशिकांत तरंगे, महारुद्र पाटील, अमोल भिसे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा दुप्पट मतांची आघाडी देऊन, जो विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्याकरीता बांधील असून सुशिक्षित बेरोजगारी कमी व्हावी व जलसंवर्धनासाठीचा पाठपुरावा याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील. इंदापूर व दौंड तालुक्यातील जनतेने मला लोकसभेत विजय होण्यासाठी मोठी साथ दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकी पेक्षा देखील यावेळी दुप्पट मतांची आघाडी दिली. या संधीनुसार या तालुक्यातील बेरोजगारी व जलसंवर्धन, पाणी प्रदूषण या महत्त्वाच्या गोष्टीवर काम करणार आहे. खडकवासलातून जो जनाधार मिळाला नाही याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वतःवर घेते. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदा खडकवासला भागाचा दौरा केला. या भागात कार्यकर्त्यांशी व थेट मतदारांशी बोलले. या भागात जी कामे प्रलंबित आहेत, ती मार्गी लावण्यासाठी प्रमाणिकपणे काम करणार आहे.
- …आम्ही खललेलो नाही
मी, पवार साहेबांची मुलगी आहे; त्यामुळे सल्ला कुणाला देत नसते. मात्र, पार्थ पवार यांना अपयश आले, हे अपयश किंवा यश जीवनात येत असते. त्यात खचून न जाता सामाजिक बांधिलकी म्हणून काम करायचे असते, अशी शिकवण पवार साहेबांची असल्यामुळे आम्ही खचलेलो नाही, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.