खटाव तालुक्यातील युवक भल्या पहाटे मैदानात
किरण देशमुख
खटाव, दि. 2 – शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. सैन्यदलामध्ये सातारा जिल्ह्याने नावलौकिक कायम ठेवला आहे. लहानपणापासूनच देशसेवेचे बाळकडू लाभलेला खटाव तालुकाही यापासून कसा दूर राहिल. भल्या पहाटे थंडीच्या कडाक्यात जेव्हा सर्वजण साखर झोपेत असतात, त्याचवेळी सैन्यभरतीच्या तयारीसाठी युवक मैदानात घाम गाळू लागले आहे.
जगात भारतीय सैन्यदलाचा मोठा दरारा आहे. या सैन्यदलात आपण असावे, अशी सळसळत्या तरुणाईची महत्त्वकांक्षा असते. मात्र, त्यासाठी सैन्य भरतीच्या चाळणीतून जावे लागते. उच्च मनोबल, शारिरिक दृष्ट्या तंदुरुस्ती, चपळता, बुद्धीचातुर्य असे सर्वगुणसंन्न असलेल्या अनेकांचा याठिकाणी कस लागतो. त्यासाठी युवक नेहमीच सराव करत असतात. दि. 7 डिसेंबर रोजी सैन्य भरतीचे आयोजन केले आहे. या पाश्वभूमीवर खटाव परिसरातील युवकांचा कसून सराव आहे.
खटाव- माणसाठी 10 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सैन्यामध्ये भरती व्हायचेच असे स्वप्न उराशी बाळगून युवक ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता धावत आहेत. थंडीची फिकीर न करता भल्या पाहटे उठून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, देश सेवेसाठी या तरुणांची धडपड सुरू आहे. तरुणांचा सैन्य भरतीकडे वाढता कल पाहता सैन्य भरतीला मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे खटाव तालुक्याचे सुपुत्र असलेले जवान सुट्टीवर आल्यावर नवतरुणांना मार्गदर्शन करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा