शिवरात श्रमदान करून ग्रामस्थांनी साजरा केला राम जन्मोत्सव
पुणे : सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या गारवडी या गावानं आज थेट शिवारात जाऊन श्रमदान करत आज ‘रामजन्मोत्सव’ साजरा केला. शिवारातच राम जन्मोत्सव आणि भजन किर्तन करत कामातच देव शोधत अनोखा आदर्श घालून दिला. त्यामुळे गावात मुखात राम नाम आणि हातात मृदा व जलसंधारणाचं काम असा अनोखा रामोत्सव आणि श्रमोत्सव साजरा करत राज्यापुढं नवा आदर्श निर्माण केला आहे.
टंचाईग्रस्त तालुका म्हणून खटाव तालुका प्रसिध्द आहे, या पाचविला पुजलेल्या दुष्काळाच्या फेऱ्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.तसेच पाणीदार होण्यासाठी गाव कमालीचं उत्साही आणि सकारात्मक झालं आहे. गारवडीकरांनी फक्त राम राम म्हणत बसण्यापेक्षा रामजन्माच्या मुहूर्ताला काम करत दुष्काळा विरोधात ग्रामस्थांच्या आगामी लढाईचा कृतीशील संदेश दिला आहे. तर या गावाच्या या आगळया वेगळया राम जन्मोत्सवामुळे सातारा जिल्ह्यातील खटाव, माण आणि फलटण या टंचाईग्रस्त 3 तालुक्यांच्या सीमेवरील आणखी एक गाव जलसाक्षरतेच्या दिशेनं निघाले असून ही जलसाक्षतेची दिंडी ग्रामस्थांनीच हाती घेतल्याने या उपक्रमाचे राज्यात कौतुक होत आहे.