देवसंस्थानचे अध्यक्ष वीर यांची माहिती
आळंदी- आषाढी पालखी सोहळा 25 जून 2019 पासून सुरू होणार आहे. यंदा माउलींचा रथ ओढण्यास बैलजोड सेवा देण्याचा मान आळंदी (ता. खेड) येथील पंडित कृष्णाजी रानवडे यांना देण्यात आल्याचे संस्थांचे प्रमुख व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.
या निवडीसंदर्भात नुकतीच आळंदी देवस्थानमध्ये बैठक घेण्यात आली. कुऱ्हाडे, धुंडरे, रानवडे, वहिले, वरखडे व भोसले आदींचा मान हा दरवर्षी चक्राकार पद्धतीने देण्याची परंपरा गावकऱ्यांनी कायम जपली आहे. त्यानुसार रानवडे परिवारास यंदाचा मान मिळावा याकरीता बैल समितीकडे अर्ज केला होता. रानवडे परिवाराच्या अर्जाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. यावेळी पैलवान शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास धुंडरे, रामदास भोसले, रमेश कुऱ्हाडे, ज्ञानोबा वहिले आदी उपस्थित होते. चर्चेअंती पंडित कृष्णाजी रानडे यांना यंदाचा माउलींच्या रथाची बैलजोडी ओढण्याचा मान देण्यात आल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.