कुरकुंभ- मळद (ता.दौंड) येथे गावाला जोडणाऱ्या खडकवासला कालव्यावरून अवजड वाहन जात असताना हा पूल वाहनासहित कोसळला होता. त्यामुळे मळदला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाला होता. नवीन पुलाचे काम चालू असल्याने सध्या गावामध्ये जाण्यासाठी सध्या शेलारवस्ती येथील एकमेव पुलावरून जावे लागते. मात्र, हा पूल देखील धोकादायक आहे.
मळद हद्दीतील खडकवासला कालाव्यावरील पुलांची अवस्था अत्यंत दैयनीय झाली असून ते केव्हाही कोसळू शकतात.पुणे-सोलापूर महामार्ग ते गावाला जोडणारा पूल अगोदरच कोसळला असून गावाची रहदारी पूर्णपणे या बाकीच्या पुलावरून अवलंबून आहे. त्यामुळे शेलारवस्ती येथील साखळी क्र.131/600, म्हेत्रेवस्ती येथील साखळी क्र.135/500 तसेच भंडलकरवस्ती येथील साखळी क्र.130/200 या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत मळद यांनी खडकवासला पाटबंधारे उपविभाग दौंड येथील सहाय्यक अभियंता यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
भंडलकरवस्ती येथील गावाला जोडणारा हा पूल लोखंडी असून त्याच्या लोखंडी प्लेट गंजून पडल्या आहेत. काही ठिकाणी अँगल वाकलेले आहेत. तरी देखील या पुलावरून वाहतूक होत असून म्हेत्रेवस्ती येथील पुलाच्या मधल्या सिमेंटच्या खांबाचे दगडी बांधकाम कोसळून पडले आहेत. काहीच पर्याय नसल्याने नागरिक याचा उपयोग करतात. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार संबंधित अधिकारी असतील, यात शंकाच नाही. त्यामुळे याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. यामुळे मोठा अपघात होण्याआधी या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा