उन्हाची तीव्रता, प्रचाराचा जोर कारणीभूत
भवानीनगर- इंदापूर तालुक्यातील बाजारपेठांमधील अर्थकारण कोलमडून पडले आहे. त्याचा परिणाम व्यापारी, शेतकरी, नागरिक, लघु उद्योगांवर झाला आहे. भवानीनगर येथे उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने दुपारी बाजारपेठ ओस पडत आहेत. बाजारपेठेत आर्थिक उलाढाल मंदावल्याची माहिती व्यापारपेठचे प्रभाकर शेट्टी यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून भवानीनगरची ओळख आहे. परिसरातील गावांचा आणि वाड्या- वस्त्याचा समावेश आणि व्यापारउदिम येथून चालत आहे.
येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामुळे बाजारपेठेला चालना मिळाली आहे. सध्या उन्हाळा कडक असल्याने सकाळी नऊपासून घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारी झळा सोसाव्या लागत आहेत. दुपारी 12 ते 4 पर्यंत व्यापारपेठमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. भरउन्हात ग्राहक घरातून बाहेर पडत नसल्याने व्यापारी दुपारी निवांत असतात. बाजारपेठेत मंदस्थितीमुळे व्यापारी चिंतेत आहेत. त्यामुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. उन्हाच्या तडाखा वाढल्याने ग्राहक मात्र सायंकाळीच व्यापारपेठेमध्ये फिरकताना दिसत आहेत.