उपनगरात खडखडाट; नागरिकांना जुलाब, उलट्यांचा त्रास
सातारा, दि.22(प्रतिनिधी)-
सातारा शहरातील उपनगरात गेली चार दिवस जीवन प्राधिकरणाच्या भानगडीमुळे अक्षरक्ष: पाणीबाणी सुरू निर्माण झाली आहे. उपनगरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. तर सध्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीसांना तर कामापेक्षा जास्त चिंता पाण्याचीच आहे. गोळीबार पोलीस वसाहतीत चार दिवसापासून पाण्याचा खडखडाट झाला आहे. बाहेरून पाण्याची सोय केल्याने नागरिकांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाले आहेत. मात्र जीवन प्राधिकरणाला याचे काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसुन येत आहे.
साताऱ्यातील जीवन प्राधिकरणाच्या भागनडी म्हणजे “”उसात लपलेल्या कोल्ह्यासारख्या आहेत”. शहरात कायमच पाण्याच्या समस्या निर्माण होत असतात, मात्र प्राधिकरणाचे अधिकारी केवळ वेळ मारून नेण्यापलिकडे ठोस असे काहीच करताना दिसत नाहीत. सातारा शहराच्या उपनगराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे तिथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना खऱ्या अर्थाने पाण्याची प्रमुख गरज आहे.
मात्र कधी पाईप लाइनला गळती, कधी ठेकेदार पळाला, ठेकेदाराने कामच व्यवस्थित केले नाही, आम्हाला कर्मचारी कमी पडतात, कायमस्वरूपी अधिकारी नाहीत अशा विविध तकलादू कारणावर जीवन प्राधिकरणाच्या अधिकऱ्यांचा नौका तरंगतात. मात्र कायमस्वरूपी ठोस असा कोणाताच उपाय आजवर तरी प्राधिकरणाच्या कारभाऱ्यांना काढता आलेला नाही.
त्यामुळे साताऱ्यातील उपनगरात प्राधिकराणाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेली चार दिवस सुरू असलेली पाणीबाणी थांबली नाही तर प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत नागरिक आहेत.
प्राधिकरणाला जाग कधी येणार?
उपनगरांना पुरवाठा करणाऱ्या पाणी स्त्रोतात सध्या तरी कोणतीच कमतरता नाही. तसेच प्राधिकरणाला सध्या कण्हेरमधून तीस टक्के जादा पाणी मिळाले आहे. तरीही प्राधिकरणाच्या कार्यालयात सुरू असलेल्या संगीत खुर्चीच्या खेळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लोकांचा सहनशिलतेचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल.
आशुतोष चव्हाण, पंचायत समिती सदस्य.
ट्रॅंकर लॉबीच्या फायद्यासाठीच?
शहरातील उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीत पाण्याचा पुरेसा साठा होत आहे. तरीही पाणीबाणी म्हणजे जीवन प्राधिकरण अन् ट्रॅंकर लॉबी यांच्यातील “दोस्ताना’ असल्याची चर्चा सध्या नागरिकांच्यात सुरू आहे.
… म्हणे समक्ष बोलू
सध्या उपनगरात सुरू असलेल्या पाण्याच्या संकटाबाबत जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मी सध्या पुण्यातून निघालो आहे. दुपारी दोन नंतर कार्यालयात समक्षा या मग बोलू असे सांगत त्यांनी फोन बंद केला.