पेठ – मागील 15 दिवसांपासून सुरू सलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बटाटा बियाणे खराब होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांची बटाटा लागवडीसाठी लगबग सुरू आहे. यामुळे सातगाव पठार भागांत उशिरा बटाटा लागवड सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
पेठ परिसरामध्ये छोट्या ट्रॅक्टरद्वारे प्रामुख्याने बटाटा लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकऱ्यांची लागवड एकाच वेळी सुरू असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक शेतामध्ये वाफसा नसल्याने शेतकरी पारंपरिक तिफणीच्या सह्याने बटाटा लागवड करताना शेतकरी अनेक ठिकाणी दिसत आहेत.
नांगरणी, फणणी, काढणी, बटाटा बियाणे, खते, शेणखत, औषध फवारणी, मजुरी, बारदान यासाठी एकरी 71 ते 75 हजार खर्च येत आहे. त्यामुळे उशिरा लागवड केलेल्या बटाटा पिकांतून नफ्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाफसा नसल्याने बटाट्याची लागवड करता येत नाही. त्यामुळे बटाटा बियाणे मोठ्या प्रमाणावर खराब होत आहेत.
बटाटा बियाण्याच्या नुकसानीने खरिपाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. बटाट्याचा पीक विम्यात समावेश केला असता तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. त्यामुळे बटाटा पिकाचा पीक विम्यात समावेश करणे गरजेचे आहे.
– मधुकर कंधारे, शेतकरी