पुणे – मेट्रो रेल प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प रेटताना कसबासह आदी पेठांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनात अन्याय होऊ नये, याकरिता हमारी अपनी पार्टी रहिवाशांच्या बाजूने उभी राहील, असे आश्वासन पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी दिले आहे.
हमारी अपनी पार्टीच्या वतीने अग्रवाल यांच्या प्रचारासाठी कसबा विधानसभा मतदारसंघातून रविवारी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी छोटे व्यावसायिक, फेरीवाले, रहिवासी यांच्या गाठी-भेटी अग्रवाल यांनी घेतल्या. यावेळी व्यापारी वर्गाने आपल्या समस्या अग्रवाल यांच्यापुढे मांडल्या. कसबा पेठ आणि गाडीखानाजवळ मेट्रो स्टेशन होणार आहे. यामुळे बाधीत होणाऱ्या रहिवाशांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अशा मागण्या लोकांनी केल्या. अग्रवाल यांनी सर्वांच्या समस्या समजावून घेतल्या.
कसबा विधानसभा मतदारसंघात वाहतुकीची समस्या मोठी आहे. त्यासाठी उपाययोजनेचा आराखडा मांडू, असे अग्रवाल यांनी जाहीर केले. अग्रवाल पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधत असल्याने प्रचार परिणामकारक होत आहे, असे हमारी अपनी पार्टीचे अध्यक्ष सुधीर जगताप यांनी सांगितले.