पुणे – रेशनदुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा विशिष्ट तारखेला धान्य घेऊन जाण्याची सक्ती करणाऱ्यांना लगाम बसणार आहे. त्याचबरोबर रेशनवरील धान्याचा काळाबाजार करण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे.
अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना रेशन दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येते. रेशनदुकानदारांकडून लाभार्थींना महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत धान्य नेण्याची सक्ती केली जाते. या तारखेनंतर गेल्यास दुकानदारांकडून लाभार्थ्यांना धान्य दिले जात नाही. धान्य शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. तसेच पुढील महिन्यात या, असे सांगितले जाते. त्यामुळे उशिरा गेलेल्या लाभार्थ्यांना दुकानदारांकडून धान्य वाटप केले जात नव्हते. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानामध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सक्ती व जबाबदारी दुकानदारावर टाकावी, अशी सूचना अधिवेशनात करण्यात आली होती.