राष्ट्रवादीत दिसला नाही उत्साह : कार्यकर्ते गायब
पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांच्या दारूण पराभवामुळे सर्व देशाचे लक्ष मावळ लोकसभा मतदार केंद्रावर केंद्रीत झाले आहे. मात्र, पंधरा वर्षानंतर शिरूर लोकसभेतील शिवसेनेचा अश्वमेध रोखणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या यशाचे मात्र फारसे कौतुक होताना दिसले नाही. घरी बसून माहिती घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पहिल्या काही फेऱ्यांमध्येच निकालाचा कल लक्षात आल्याने ते बालेवाडी स्टेडियममधील मतमोजणीकडे फिरकले नाहीत. तर कोल्हे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अगदी बोटांवर मोजण्याऐवढे कार्यकर्ते उपस्थित होते.
बालेवाडी स्टेडियमनजीकच्या एका हॉटलेमध्ये बसूनच डॉ. अमोल कोल्हे निकालाची माहिती घेत होते. विजय दृष्टीक्षेपात येताच ते मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या विजयाला अधिकृत दुजोरा मिळताच ते मतमोजणीच्या ठिकाणाहून बाहेर पडले. बालेवाडीच्या स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर त्यांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत, भंडाऱ्याची मुक्त उधळण करत, राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. दुपारी चारनंतर कोल्हे यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत विजयी मिरवणुकीकडे रवाना झाले.
बालेवाडी स्टेडियममधून निकालाची घोषणा होत असताना, पार्थ पवारच्या पराभवाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कल्पना आली. मात्र, फेऱ्यांनुसार मताधिक्क्याची आकडेवारी वाढत गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोल्हेंच्या विजयाचा आनंद झाला होता, मात्र, पार्थच्या पराभवाची नाराजीदेखील लपविता येत नव्हती. तर अशीच अवस्था शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीदेखील झाली होती. बारणेंच्या दणदणीत विजयाचा आनंद व्यक्त करताना, आढळराव चौकार ठोकू शकले नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. खास शिरूर लोकसभा मतदार संघाचा निकाल ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना आढळराव यांच्या पराभवामुळे बारणेंच्या विजयात समाधान मानावे लागले. सायंकाळी साडे चार वाजता तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेडियमच्या आवारातून काढता पाय घेतला.
श्रीरंग बारणेंचा विजय निश्चित झाल्यानंतर सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली. त्यामध्ये मावळचे आमदार बाळा भेगडे, पिंपरीचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्याबरोबरच सेना-भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मात्र दिसले नाही. विजयाच्या जल्लोषात केवळ शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकताना दिसला.
कार्यकर्त्यांची नगण्य उपस्थिती
बालेवाडी स्टेडियममध्ये गुरुवारी (दि.23) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, तरी देखील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्य होती. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी केलेल्या स्वतंत्र व्यवस्थेच्याठिकाणी केवळ पोलिस कर्मचारी आणि चार-दोन कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उन्हाच्या झळा वाढत असतानाच हे कार्यकर्ते आणि पोलिसदेखील सावलीचा आडोसा घेत अन्यत्र बसकन मांडली होती. व्हीआयपी पार्किंग तर पूर्णपणे रिकामी होती.
विजयाने बारणेंचे शिवसेनेतील वजन वाढले
माजी उपमुख्यमंत्री आणि हेवीवेट मराठा नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभेची निवडणूक लढवित असल्याने राज्याबरोबरच देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते. मात्र, पार्थचा दारूण पराभव केल्याने शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. शरद पवार यांच्या नातवाचा पराभव करणाऱ्या बारणेंना केंद्रात महत्वाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारणे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे आणि पार्थ पवार यांना पराभूत केल्याने त्यांना मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा आतापासूनच कार्यकर्त्यांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.