नगीना – पंतप्रधान मोदींनी आता पाकिस्तान हा विषय सोडून आता बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा देशांतर्गत प्रश्नावर बोलून त्याकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे. शिंदे हे कॉंग्रेसचे सरचिटणीस असून त्यांच्याकडे पश्चिमी उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते म्हणाले की उत्तरप्रदेशच्या बाबतीत कॉंग्रेसने राबवलेली निवडणूक स्ट्रॅटेजी आणि उमेदवारांची निवड अत्यंत समाधानकारक असून त्याचे निकालात चांगले पडसाद उमटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वताच्या पक्षाचे बळ वाढवण्यासाठीच कॉंग्रेस या राज्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहे असे ते म्हणाले.
देशात आज अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्यांना मोदींचे सरकारच जबाबदार आहे. पण यापैकी कोणत्याही प्रश्नावर न बोलता मोदी कायम पाकिस्तानचाच विषय सातत्याने उपस्तित करीत आहेत. त्याऐवजी त्यांनी रोजगारासारख्या गंभीर समस्येवर बोलायला हवे. या देशातील नागरीकांचा मान, सन्मान आणि पेहचान महत्वाचा असून त्यांना तो प्रदान करण्यासाठी आपले सरकार काय करणार किंवा त्यांनी याबाबतीत काय केले हे त्यांनी सांगायला हवे असे ते म्हणाले. आज पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होंते. ते म्हणाले की जेव्हा साऱ्या देशाचा विषय उपस्थित होतो त्यावेळी भाजप किंवा कॉंग्रेस हा विषयच उपस्थित होत नाही, तेथे आम्ही सारेच एक असतो. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानवर बोलण्यापेक्षा आता देशांतर्गत विषयांवर बोलणे संयुक्तीक ठरेल.