नवी दिल्ली – गेल्या तीन वर्षात शेजारील देशांतून एकूण सुमारे चारशे दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली त्यातील 126 जण चकमकीत ठार झाले अशी माहिती सरकारतर्फे आज लोकसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती देताना सांगितले की या घुसखोर दहशतवाद्यांशी लढा देताना सुरक्षा दलांचे 27 जवानही कामी आले आहेत.
जम्मू काश्मीरच्या भूमीतूनच ही घुसखोरी प्रामुख्याने होते. घुसखोरीची वार्षिक आकडेवारीही त्यांनी यावेळी सादर केली. त्यानुसार सन 2018 मध्ये घुसखोरीच्या 143 घटना घडल्या. 2017 मध्ये 136 आणि सन 2016 मध्ये 119 घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात घुसखोरीच्या प्रमाणात 43 टक्के घट झाल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.