उदयनराजें विरोधात लढण्यास सांगितल्याने शिवसेनेला केला रामराम
राजगुरूनगर- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मला साताऱ्यातून उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास विचारले होते. मी मात्र, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचे सांगितल्याने मतभेद झाल्यानंतर शिवसेना सोडली. छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नाही, असे सांगून शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला असा गौप्यस्फोट उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ राजगुरुनगर शहरातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली, त्यानंतर प्रचाराची जाहीर सांगता सभा खेड बाजार समितीच्याआवारात झाली. यासभेत डॉ. कोल्हेंनी वरील गौफ्यस्फोट केला आहे. दरम्यान, या पदयात्रेत संभाजी मालिकेतील सेलेब्रिटी खास आकर्षण ठरले.
आळंदीच्या दोन नगरसेवकांचा व तालुक्यातील अनेक शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते, राम कांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, देवदत्त निकम, मनसेचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, छत्रपती संभाजी महाराज महामालिकेतील कलाकार प्राजक्ता गायकवाड व त्यांची टीम तसेच महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, येथील 15 वर्षे खासदार असलेल्या व्यक्तीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला न्याय देत येत नसेल तर उपयोग काय. तुम्ही सरकारमध्ये आहात, त्यांना रस्त्याची समस्या सोडवता का येत नाही. असा सवाल करीत आढळराव यांच्यावर नाव न घेता टीका केली. कर्जमाफी शेतीमालाला दीडपट आधारभूत किंमत, तरुणांना रोजगार, नोटाबंदी या मद्द्यांवर सरकारवर टीकास्र सोडले. या देशात 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबाला या सरकारने वाऱ्यावर सोडले. राज्यात महिला सुरक्षा नसल्याने अनेक मंत्र्यांवर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले जातात, असे त्यांनी नमूद केले.
- मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. खासदार आढळराव पाटील यांना तीनवेळा डोक्यावर घेणारा तालुका डोक्यावरून खाली टाकणार यात शंका नाही. जनतेला फसविण्याचे काम केले तालुका विकासापासून वंचित ठेवला त्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे.
– दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार, खेड तालुका