चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नईला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यावर तोडगा काढत सरकारने चेन्नईला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी आज सकाळी वेल्लोरच्या जोलारपेट रेल्वेस्थानकावरून पहिली रेल्वे चेन्नईला रवाना करण्यात आली आहे.
आज सकाळी विधीवत पुजा करून ही पहिली रेल्वे चेन्नईच्या दिशेने निघाली. दरम्यान, चेन्नईला पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यावर राज्य सरकारने गंभीरपणे पावले उचलली आहेत. रवाना करण्यात आलेली रेल्वे ही 50 वॅगनची असून यात तब्बल 2.5 मिलीयन लिटर पाणी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, तब्बल 220 किमीचा पाच तासांचा प्रवास करून ही रेल्वे चेन्नईच्या विलीवाक्कम स्थानकापर्यंत पोहचणार आहे. तसेच याठिकाणी असणाऱ्या वॉटर पंपांच्या मदतीने शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या एका फेरीसाठी राज्य सरकार 7.5 लाख मोजणार आहे. यासंपूर्ण प्रक्रियेसाठी राज्य सरकारला तब्बल 64 कोटींचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून चेन्नई शहराला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.