पुणे – गरोदर मामीचा खून करणाऱ्या पोलीस भाचीला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी.अग्रवाल यांनी सुनावली.
रुपाली उत्तम खेडेकर ऊर्फ रुपाली बाळासाहेब बोरकर (वय 27) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. उषा समीर भोसले (वय 28, रा. उरळी कांचन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विष्णू बाजीराव भोसले (वय 47) यांनी उरळी कांचन पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी 12 साक्षीदार तपासले. उरळी कांचनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक के.टी.पवार यांनी तपास केला.
विष्णू यांचे चुलतभाऊ समीर हे उरळी कांचन येथील सर्वज्ञ हाईट येथे फ्लॅट क्रमांक चारमध्ये राहत होते. समीर हा सिव्हील इंजिनिअर असून कॉन्ट्रक्टची कामे घेतो. तर त्याची पत्नी उषा सहा महिन्यांची गरोदर होती. भाची रुपाली ही सुद्धा या इमारतीत फ्लॅट क्रमांक सहामध्ये पतीसह राहत होती. 14 जुलै 2014 रोजी समीर यांनी विष्णू यांना फोन केला. पत्नी उषा फोन घेत नसल्याचे सांगितले. त्यानुसार विष्णू यांनी घरात जावून पाहिले. त्यावेळी उषा घरात दिसून आली नाही. पण, फ्लॅट नंबर सहाचे दरवाजाजवळ त्यांना आतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा दरवाजा वाजवला. मात्र, तो उघडण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजाचे कोयंड्याचे शेजारील छिद्रातून घरात पाहिले. त्यावेळी रुपाली हिने उषा यांनी ओढीत नेल्याचे दिसले. त्यानंतर सुरक्षारक्षक दरवाजा तोडून आतमध्ये गेला. त्यावेळी दरवाजाचे आत रक्ताने माखलेले कागदे दिसली. तसेच रुपाली ही त्याठिकाणी हॉलमध्येच उभी दिसली. तर बाथरुममध्ये उषा मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या.
खुनाचे कारण अस्पष्ट असतानाही शिक्षा
याविषयी अतिरिक्त सरकारी वकील रमेश घोरपडे म्हणाले, आरोपी पोलीस कर्मचारी होती. त्यामुळे तिला कायद्याचे ज्ञान होते. त्यामुळे खुनाचे कारण जरी स्पष्ट झाले नाही, तरी गुन्हेगारास शिक्षा होऊ शकते, हे या केसमधून सिद्ध झाले आहे. मयत उषा भोसले यांचा मृतदेह आरोपीच्या घरात मिळून आला. त्यांना मारण्यात आलेला लोखंडी रॉड आणि गळा आवळलेली दोरी पोलिसांनी घटनास्थळी जप्त केली. खेडेकर हिच्या घरातील फरशीवर सांडलेले रक्त आरोपीने कागदी बोळयांनी पुसले ते दिसून आले. खून करून मृतदेह बाथरुममध्ये टाकण्यात आला आणि इमारतीतील लोक घरात आल्यानंतर आरोपीने बाथरुमचा दरवाजा उघडू दिला नाही, ही बाब समोर आली. अज्ञात दोन चोर येऊन त्यांनी मारहाण केल्याचा बनाव केला. त्यावेळी पोलिसांना फोन केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना खून केला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशाप्रकारे खुनाचे कारण माहिती असेल, तर शिक्षा देता येऊ शकते, हे सर्वोच्च न्यायालयाचे चार ते पाच केसेसच्या निर्णयाच्या आधारे स्पष्ट होते.