खेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
चिंबळी- पाण्याचा प्रश्न कोणी सोडविला तर राष्ट्रवादीनेच, धरणे कोणी बांधली तर राष्ट्रवादीनेच. मग या खासदारांनी 15वर्षांत कोणती काम केली? का यांनी फक्त “गाजराची’च शेती केली? असा सवाल खेड तालुक्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ खेड तालुक्यात गावभेटीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खेड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, बाबा राक्षे, विलास कातोरे, सरपंच रेश्मा सोनवणे, आप्पासाहेब लोखंडे, हेमंत जैद, अनुराग जैद, काशिनाथ बटवाल, खंडु पाटारे, उद्योगपती दादासाहेब जैद, निर्मला पानसरे, पूजा बुट्टेपाटील, सरपंच मंगल दाभाडे, उपसरपंच स्वाती बरबटे, जयसिंग भोगाडे, कैलास चौधरी, अनिल शिंदे, संजय गायकवाड, भिकाजी पिंगळे, साहेबराव भोगाडे, सोपानराव भोगाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वादळी पावसातही सभेला गर्दी होती. विशेष म्हणजे वीज गेल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सभा झाली. चिंबळी ग्रामस्थांनी 1 लाख 50 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करुन डॉ. कोल्हे यांना सुपूर्द केली. दरम्यान, ठिकठिकाणी डॉ. कोल्हे यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. काही ठिकाणी तर भर पावसात सभा झाल्या. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, संविधानानुसार आपल्याकडे संसदीय लोकशाही गेल्या 70 वर्षांपासून आहे. त्यामुळे आपल्याला खासदार निवडून द्यायचा आहे पंतप्रधान नाही. तसेच गेल्या 15 वर्षांपासून तुमचा जो काही राग आहे तो या निवडणुकीत व्यक्त करा, आणि लोकशाहीसाठी निष्क्रिय खासदाराला घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले.
- कोठे पूल बांधायचा, ग्रामस्थांना काय हवे, काय नको हे आम्हाला कळते मग तुम्हाला 15 वर्षांत का नाही कळले. सत्ता तुमची आहे पण ती नागरिकांसाठी असली पाहिजे. आता चुकीला माफी नाही. पुणे-नाशिक रस्त्याचे रुंदीकरण का रखडले?, पुणे-नाशिक रेल्वेचे काय झाले? विमानतळाचे काय झाले? नुसते आमिषांचे गाजरच दाखविले.
– दिलीप मोहिते, माजी आमदार, खेड तालुका