मुंबई – कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत भांडणे शिगेला पोहचली असून ती मिटविण्यासाठी दिल्लीतून त्यांच्या नेत्यांना यावे लागत आहे. कॉंग्रेसचे राज्यातील नेतृत्व पूर्णपणे गोंधळलेले आहे, अशी टीका करतानाच अशा कॉंग्रेसच्या मागे राज्यातील जनतेने का जावे? असा सवाल भाजप नेते आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडची उमेदवारी बदलून घ्यायची होती पण ती घेता आली नाही. याचा सर्वात जास्त आनंद हा पृथ्वीराज चव्हाण यांना झालेला दिसत आहे. विखे-पाटील पडद्यामागे जात आहेत आणि मग महाराष्ट्रात एकहाती नेतृत्व आपल्याला मिळेल या आनंदात पृथ्वीराजबाबा खूश आहेत, असे तावडे म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याचा संदर्भ घेत तावडे म्हणाले, आदर्श घोटाळ्यात उच्च न्यायालयाने यापेक्षा अधिक गंभीर शब्दांत चव्हाण यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे खरेतर अशोक चव्हाण यांनी राजकारण सोडले पाहिजे.
युती फोडणाऱ्याचा स्वप्नभंग
आज गांधीनगरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थित होते. ठाकरे यांनी आपल्या उपस्थितीतून शिवसेना-भाजप युती घट्ट असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीला आतून फोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.