वृक्ष आपली मूळे मातीत खोलवर नेते व त्याचवेळी आकाशाला भिडण्याचेही काम करीत असते. त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्था हीसुद्धा अण्णांच्या विचारांचा जागर हा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवित तर आहेच. पण त्याचबरोबर जागतिकीकरण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नवनवीन शैक्षणिक धोरणे राबवून प्रगतीचा आलेख उंचावत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने…
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हा एक शैक्षणिक विचार आहे. कारण त्यांच्या जीवनपटाकडे बघितले तर लक्षात येते की संस्थेचे कार्य, शिक्षणाचा प्रसार, संस्थेचे सेवक व कार्यकर्ते यासंदर्भात ते सतत बोलत होते, काम करीत होते. त्यांच्या जीवनपटलावरील प्रत्येक घटना जीवनाला दिशा देणारीच आहे. ध्येयाने झपाटलेली व्यक्ती स्वबळावर समाजकारणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या भूमीवर क्रांती घडविते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्मवीर अण्णा.
एखादी व्यक्ती प्रत्यक्ष काम करण्याच्या माध्यमातून संपूर्ण जगापुढे विचारांचा आदर्श ठेवते व हेच विचार जीवन निकोप पद्धतीने जगण्याची उमेद देते. कर्मवीर अण्णांचे व्यक्तीमत्व व जीवनधारा हे याचेच प्रतिक आहे. सध्याच्या या स्थानबद्धतेच्या परिस्थितीत कर्मवीर अण्णांचे विचार दिशादर्शकाचे काम करतात. कर्मवीर अण्णा नेहमी काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे व्यक्तीमत्व होते. म्हणूनच शिक्षणाच्या प्रवाहात ते सातत्याने प्रयोगशील राहिले. त्यांच्यावर सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देणाऱ्या जोतिबा फुलेंचा प्रभाव होता तर निर्भय व लोककल्याणकारी जीवनाचा विचार रुजविण्याऱ्या शाहू महाराजांचा भाव अण्णांच्यात होता, तसेच महात्मा गांधीजींची सर्वधर्मसमभाव, सत्यप्रियता तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कणखरपणा व बाणा यांचा मिलाप त्यांच्या व्यक्तीमत्वात होता. आणि म्हणूनच त्याचे विचार व जीवनपट आधुनिक काळातही पूरक आहे.
जातिभेदाची उतरंड नाकारून समाजातील सर्व स्तरापर्यंत शिक्षणाचा विचार पोहचविणारे कर्मवीर अण्णा म्हणूनच निराळे. समाजातील गरीब, दीनदलित विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये एकत्र आणून मानवतेचा विचार समाजात रुजविणारे अण्णा हे प्रवाहाविरुद्ध दोन हात करणारे व्यक्तीमत्त्व होते. आधुनिक काळात जातीचे राजकारण करणाऱ्या समुहाने हे विचारात घेतले पाहिजे. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून जातीभेदाच्या पलीकडील मानवतेचा भाव रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मांडला. संपूर्ण जगाने हे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने स्वीकारले तर जगाचा विकास हा मानवाच्या प्रगतीसाठी घडेल यात अजिबात शंका नाही.
कमवा नि शिका’ हा अण्णांचा विचार आजही महत्त्वाचा ठरतो. देशातील अनेक विद्यापीठे, शिक्षणसंस्थांनी कमवा नि शिका’चा अंगिकार केला आहे. कर्मवीर अण्णांनी खूप पूर्वी श्रमाला प्रतिष्ठा देणारा हा मांडलेला विचार त्यांची दूरदृष्टीच अभिव्यक्त करतो. स्वावलंबी शिक्षणाची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणातही दिसून येते आणि कमवा नि शिका’चे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवरही अधोरेखित होते. अण्णांनी स्वतः दारोदारी फिरून समाजातील तसे अठरापगड जातीतील विद्यार्थी स्वतःच्या खांद्यावरून आणून शिक्षणाचे दालन खुले केले व शिक्षणाचे कार्य हे सेवाभावी व लोककल्याणासाठीच आहे हे दाखवून दिले. आधुनिक काळात अण्णांच्या विचाराशी प्रामाणिक राहून नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव भाऊसाहेब कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत संगणकाचे ज्ञान पोहचविण्याचा प्रयत्न संस्थेकडून सातत्याने केला जातो.
वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. शासनाकडून संस्थेला अटल टिंकरींग लॅंबची योजना मिळाली व त्या अंतर्गत 300 लॅंबची परवानगी मिळाली. त्यापैकी 100 लॅंब प्रत्यक्षात तयार आहेत. संशोधनाच्या क्षेत्रातही प्रोत्साहन देण्यासाठी सातारा, पुणे व नवी मुंबई येथे सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन उपलब्ध आहे. सध्याच्या स्थानबद्धतेच्या परिस्थितीतही संस्थेने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. रयत शिक्षण संस्था येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा जागर हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.डॉ. सविता पाटील – कोठावळे
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची अनेकाविध रुपे नजरेसमोर तरळली. शिक्षणाचा विचार खेडोपाड्यांपर्यंत पोहोचवण्याची दिशा देणारे कर्मवीर अण्णा, जातिभेदाची तटबंदी शिक्षणाच्या माध्यमातून जमीनदोस्त करणारे कर्मवीर अण्णा, स्वतःच्या कार्यप्रणालीतून प्रबोधनाची मशाल धगधगत ठेवणारे अण्णा तसेच सर्व जगाला कमवा आणि शिका’ ही सुत्री देणारे अण्णा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा जागर हा रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने एकाच वेळी दोन माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत आहे. रयत शिक्षण संस्था वटवृक्षाप्रमाणे व्यापक बनली आहे.