खासगीकरणाच्या स्पर्धेत सहकारची चलती : 238 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
पुणे- गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले साखर कारखान्यांची धुराडे आता चार दिवसांत बंद होणार आहेत. आता राज्यातील 195 साखर कारखान्यापैकी 195 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तसेच राज्यात 107 लाख टन साखर गाळप करण्यात आली आहे. यंदा थंडीचा मुक्काम जादा काळ लांबल्यामुळे साखर उताऱ्यातील 0.03 टक्के वाढ अधोरेखित करीत आहे. साखर उत्पादन वाढ झाली असून राज्यात ऊस गाळप, साखर उतारा यात कोल्हापूर पाठोपाठ पुणे विभाग दुसऱ्या स्थानी आहे.
ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यानंतर ऊस आंदोलनाचा बार लवकर फुटल्यामुळे गाळप हंगामाने वेग घेतला. त्यात यंदा पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी काटेकोरपणे नियोजन केले होते. दुष्काळाची चाहूल लवकर लागल्याने साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रणा सक्षमपणे राबविली. त्यात पुणे जिल्ह्यातील नीरा- भीमा, कर्मयोगी, श्री छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी नेटकी यंत्रणा उभी केल्यामुळे दुष्काळात पोहचणारी झळ काही अंशी कमी झाली. राज्यात 102 सहकार साखर कारखाने आणि 93 खासगी कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू केले. आता सहकारी साखर कारखान्यांनी 556 लाख टन उसाचे गाळप केले तर खासगी कारखान्यांनी 396 लाख टन ऊस गाळप केले. यात सहकाराचा वाटा सर्वाधिक असला तरी 102 सहकारी साखर कारखान्यांपाठोपाठ खासगी कारखान्यांची संख्या आहे. भविष्यात खासगीकरणाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
- सरासरी साडेअकरांच्यावर साखर उतारा
पुणे विभागात 32 साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यात 205.76 लाख टन ऊस गाळप केले. 238.85 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखर उतारा हा सरासरी 11.61 इतका आहे. कोल्हापूर विभाग हा सर्वच बाजूंनी सरस राहिला आहे. त्यात कारखान्यांची संख्या 38 आहे. ऊस गाळप हे 215.84 लाख इतके झाले आहे. 267.14 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा हा 12.38 इतका आहे. हा साखर उतारा राज्यात सर्वाधिक आहे.