आळंदी, डुडुळगाव परिसरात साचण्यास सुरुवात
चिंबळी- इंद्रायणी नदीपात्रात मावळातील आंद्रा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आळंदी, मरकळ व पुढील गावांच्या बंधाऱ्यात जावे याकरिता मोशी बंधाऱ्याचे दोन-तीन ढापे काढण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीत मोशी भागात जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून जलपर्णी काढून काठावर टाकण्यात येत होती; परंतु पाणी सोडण्यात आल्यापासून हीच जलपर्णी काढण्याऐवजी पाण्यासोबत पुढे आळंदीच्या दिशेने ढकलून देण्यात येत आहे.
जलपर्णी पुढे ढकलून दिली जात असल्याने आळंदी, डुडुळगाव भागात लाखो टन जलपर्णी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पुढील आळंदी बंधाऱ्यावर येत्याकाळात जलपर्णीमुळे ताण येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जलपर्णी पाण्यासोबत ढकलून देण्याऐवजी त्याच ठिकाणी काढणे योग्य ठरेल, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
जलपर्णी काढणाऱ्या कामगारांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, नेहमीप्रमाणे ही जलपर्णी पुढे ढकलून डुडुळगाव हद्दीत काढून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पण प्रत्यक्ष गेल्यावर्षीचा अनुभव पाहता ही जलपर्णी जागीच पडून राहते आणि पावसाळ्यात पुरासोबत वाहून जाते. या जलपर्णीचा जास्त त्रास आळंदी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सिद्धबेट बंधाऱ्यावर होतो. पिंपरी-चिंचवड हद्दीतून वाहून आलेली जलपर्णी मोठ्या प्रमाणात या बंधाऱ्यात अडकते तेथील पाणीपुरवठा यंत्रणेला लाखो टन जलपर्णी हटविणे देखील अवघड जाते.