यंदा किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ : साडेपाचपासून 17 हजारांपर्यंत उपलब्ध
आळंदी -पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीकडून भजन-कीर्तनासाठी टाळ-मृदंगाची मागणी वाढल्यामुळे आळंदी शहरातील कारागिरांचे हात मृदंग बनविण्यात रंगलेत. मृदंगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या भाव वाढीमुळे यंदा मृदंगाच्याही किमती सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढले असल्याचे कृष्णाई पखवाजचे निर्माते विजय वाडेकर यांनी सांगितले.
आषाढी वारीसाठी देहू-आळंदीसह राज्यातून पंढरपूरला वारीस जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, हरिनाम गजर आणि साथीला दिंड्या दिंड्यांतून मृदंगाच्या आवाजाची वैभवी जोडहे दृश्य पाहत आषाढी वारीचा आनंद सोहळा अनेक जण अनुभवतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या दिंड्यांनी आषाढी यात्रेची तयारी सुरू केली आहे. वारीला टाळ, वीणा आणि मृदंगाचा त्रिवेणी संगमहोत असल्याने प्रत्येत दिंडीत मृदंग मुख्य आकर्षण असतो. हरिनाम सप्ताहांसाठी तीर्थक्षेत्रात वर्षभर मृदंगांना मागणी असते. आषाढी वारीच्या काळात मात्र या मागणीत वाढ होत असल्याचे आळंदीतील मृदंग निर्माते विजय वाडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आळंदीत वर्षभर मृदंग बनविण्याचे काम सुरू असते. आतापर्यंत अनेक मृदंगांची विक्री झाली आहे.पालखी सोहळा आळंदीतून पुढे जाईपर्यंत यात आणखी वाढ होईल. मृदंगाच्या किंमती साडेपाच हजार रुपयांपासून सतरा हजार रुपयांवर आहेत. कच्च्या मालाच्या भाववाढीने किंमती वाढल्यामुळे यंदा मृदंगाच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, दर्जेदार मृदंग निर्मिती असल्याने भाविक, वारकरी देखील याचा विचार करीत नाहीत असा आमचा अनुभव आहे. राज्यात तसेच आळंदीत मृदंग बनविणारे जे कारागीर आहेत ते बरेच येथूनच शिकले असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.
दिवसभरात दोन ते तीन मृदंग बनविले जातात . कारागिरांना मिळणारा मोबदला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढला असला, तरी महागाईने तो कमीच पडतो.
– विठ्ठल कांबळे, मृदंग कारागीर, आळंदी
“त्या’ मृदंगाच्या किमती कमी
खैर, शिसम, सागवान, बिबला झाडाचे लाकूड आता स्टीलचे ही तयार होत असल्यामुळे मृदंग किमतीने जास्त असतात. तर आंबा, कडुनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या मृदंगाच्या किमती त्या मानाने कमी असतात. मृदंगासाठी लागणारे लाकूड दिल्ली परिसरातून येत असते. कातडे सोलापूरहून तर आवाजासाठी आवश्यक असणारी शाई आणि खळ ही गुजरात राज्यातून येत असल्याचे विक्रेते विजय वाडेकर यांनी सांगितले.