आळंदी – जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे पुणे शहरातील कोंढवा परिसरात तीन दिवसांपूर्वी सीमाभिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी (दि. 2) पुन्हा सिंहगड महाविद्यालयाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरम्यान, अशीच गंभीर घटना आळंदीत घडण्याची शक्यता नाकारता येत नसून येथे गेली 75 वर्षांपूर्वीच्या काही धर्मशाळांच्या इमारती पडण्याच्या मार्गावर असून त्या मोडकळीस असल्याने जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आळंदीमध्ये प्रदक्षिणा मार्गावर अखिल मंडई मंडळाची धर्मशाळा ही 75 वर्षांची पूर्ण झाली असून, ती आता मोडकळीस आल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. त्याचबरोबर येथील हजेरी मारुती मंदिरालगत असणारा नाईक वाडा हा देखील धोकादायक झाला असून तो रस्ता रुंदीकरणासाठी अर्धा पाडण्यात आला असल्याने त्याच्या मजबुतीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखिल भाजी मंडई मंडळाची धर्मशाळा ही मुख्य प्रदक्षिणा मार्गावर असून येथे श्रीज्ञानेश्वर महाराजांची बहिण मुक्ताबाई यांच्या पाठीवर मांडे भाजण्यासाठीचे ऐतिहासिक ठिकाण असून, रोज हजारो भाविक मुक्ताईच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मात्र, येथील वास्तूही ही अतिशय जुनी व मोडकळीस आलेली असून भविष्यात केव्हाही ती नेस्तनाबूत होऊ शकते, त्यामुळे आलेल्या भाविकांचा जीव देखील धोक्यात जाऊ शकतो. तरी नगरपरिषदेने जुन्या धर्मशाळा मठ व जुने वाडे यांची पाहणी करून संबंधितांना त्या इमारती दुरुस्त करण्याची जाहीर नोटीस द्यावी, अशी मागणी अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी केली आहे. भविष्यात कोंढवा येथील झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे निवेदन आम्ही प्रतिष्ठानच्यावतीने देत आहोत, असेही येळवंडे यांनी सांगितले.